बालाजी निरफळ, धाराशीव : विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. तसेच जो उमेदवार योग्य वाटेल त्याला निवडून द्या आणि नसेल त्याला पाडा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. पण निवडणुकीतून माघार घेऊन सुध्दा जरांगेंवर राजकीय वर्तुळात टीका होतच आहे. अशात आता ‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी नाव न घेता मनोज जरांगेवर हल्ला चढवला आहे.
नितीन गडकरी यांची आज नळदुर्ग शहरात राणा पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नितीन गडकरी बोलत होते. तुम्ही आजपर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संत महंतांच्या जाती बघितल्या आहेत का? एवढेच नाही तर तुम्ही तुम्हाला भूक लागल्यावर हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे कोणी बनवलंय कोणत्या जातीचा असा विचार करता का? मग राजकारणात मतदानाच्या वेळीच ही जात कुठून येते, असा सवाल नितीन गडकरी यांनी जनतेला केला होता.
पुढे गडकरी म्हणाले की, जो आपल्याला पाणी देईल विकास करेल, त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे.जात व्यवस्था ही काहीच नसते मी मानत नाही, असे देखील नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
नितीन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी
नितीन गडकरी मंगळवेढा येथे हेलीपॅड वर दाखल होताच निवडणूक विभागाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलाी. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी मंगळवेढा आले होते. त्यावेळी ही तपासणी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.



