LONAVLA : लोणावळा शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद परिक्षेत्रातील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरखा जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काही कामानिमित्त लोणावळा शहरात आलेले आहे. त्यावेळी त्यांची भेट घेत माजी नगराध्यक्षा सुरखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी वरील मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत समीर इंगळे, अनिल गायकवाड, देवराम लोखंडे आणि अनिल खिलारे हे उपस्थित होते. लोणावळा शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिध्द असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी शहरामध्ये होणे ही नित्याचीच बाब झालेली आहे. असंख्य पर्यटक भेट देत असल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होणे, तासनतास ट्रॅफिक जाम होणे, यामुळे शहराचे पर्यटनावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. भविष्यात पर्यटकांचे संख्येत वाढच होणार असल्यामुळे शहरातील ट्रफिक समस्या व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी ही परिस्थिती भयावह असणार आहे. यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक असून नगरपरिषद परिक्षेत्रातील वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 रुंदीकरण लवकरात लवकर केल्यास कायम स्वरुपी महामार्गावरील वाहतूकीची कोंडी सुटेल. असे निवेदन नितीन गडकरी यांना देण्यात आले आहे.



