लोणावळ्यातील भाजे धबधबा आणि विसापूर किल्ला मार्गावर पुन्हा एकदा धोकादायक पर्यटनामुळे दुर्घटना घडली. अब्राहम शिंसे हा तरुण विसापूर किल्ल्याकडे जात असताना पाय घसरून दरीत पडला. अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.
आजच्या बचाव कार्यात सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर आणि ओंकार पडवळ अशोक उंबरे यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. या दुर्घटनेची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली.
पावसाळ्यात या परिसरात निसरडे दगड, चिखल आणि घसरण्याचा मोठा धोका असतो. प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत असूनही अनेक पर्यटक नियम झुगारून धोकादायक मार्गांवर जातात. त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत. प्रशासनाने पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची व इतरांची सुरक्षा लक्षात घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.



