मावळ प्रतिनिधी : राजकारणात केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांची परंपरा मोडून प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून दादांनी स्वतःच्या कार्यातून नवा आदर्श निर्माण केला आहे.
१९ जून २०२५ रोजी वाढदिवसानिमित्त दादांनी आंबा, नारळ, वड, पिंपळ, कैलासपती व खाया यांसारख्या झाडांचे वृक्षारोपण केले होते. वृक्षारोपण करणे हीच जबाबदारी मानणाऱ्या बऱ्याच जणांपेक्षा वेगळे ठरून दादा आजही या झाडांची निगा राखत आहेत. पाणी घालणे, खत टाकणे, तण काढणे आदी जोपासना स्वतः करत असल्यामुळे ही रोपे आता जोमाने वाढत आहेत.
“फक्त झाडे लावून फोटो काढणे म्हणजे पर्यावरण संरक्षण होत नाही. खरी जबाबदारी म्हणजे त्या झाडांचे संगोपन करणे,” असे दादांचे मत असून त्यानुसार ते प्रत्यक्ष कृतीतून उदाहरण घालून देत आहेत.
पर्यावरणाबाबत संवेदनशीलता दाखवणारे प्रशांत दादा भागवत हे केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे तर समाजसेवक आणि पर्यावरण संरक्षक अशी दुहेरी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत असले तरी लोकांच्या मनात दादांविषयीचा विश्वास हा त्यांच्या पर्यावरणप्रेमी कार्यामुळे अधिक दृढ होत आहे.
मावळ तालुक्यातील युवकांसाठी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश दादांनी आपल्या कृतीतून जिवंत केला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना नवीन उर्जा मिळत असून दादांचे हे वृक्षप्रेम लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.












