अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी असून प्रचाराचा झंझावात सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवरती मतदान येऊन ठेपलंय.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पूर्व, मध्य आणि पश्चिम असे तीन मतदारसंघ आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सामाना अत्यंत चुरशीचा होणार आहे. या मतदार संघात विविध फॅक्टर काम करत आहेत. त्यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण मुळी यांनी माहिती दिलीये.
छत्रपती संभाजीनगर शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील जातीय समीकरण महत्त्वाचं ठरलं होतं. यामध्ये मराठा समाजाचं महत्त्व जास्त असणार आहे. तसेच मुस्लिम मतंही निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणार आहेत.
यंदा महाराष्ट्रात कुणाचं सरकार? जनता एकालाही देणार नाही बहुमत, राजकीय विश्लेषक असं का म्हणाले?
शहर मध्य मध्ये कुणाचं वजन?
संभाजीनगर शहरातील मध्य मतदार संघामध्ये महायुतीकडून प्रदीप जयस्वाल त्यासोबतच महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात आणि नासिर सिद्दिकी हे तीन उमेदवार उभे आहेत. तर या मतदारसंघांमध्ये बाळासाहेब थोरात यांना जातीय समीकरणाचा किंवा जातीय राजकारणाचा फायदा होऊ शकतो, असं ज्य़ेष्ठ पत्रकार मुळी सांगतात.
पूर्व भागात चुरशीचा सामना
छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघात भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लहुजी साळवे उभे आहेत. मागचा वेळी अतुल सावे हे अवघ्या काही मतांनी निवडून आले होते. यावेळी कोण बाजी मारणार हे बघणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणावर बोलावं तर कोल्हापूरकरांनी! जनतेचं ‘उत्तर’ काय? तुफान फटकेबाजीचा Video
पश्चिम मतदारसंघात कौल कुणाला?
छत्रपती संभाजी नगर शहरातील पश्चिम मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे संजय शिरसाठ आणि ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात सामना आहे. मागच्या निवडणुकीमध्ये देखील राजू शिंदे यांनी संजय शिरसाठ यांना चांगलीच टक्कर दिली होती. या ठिकाणी देखील आता निवडणूक रंगतदार होणार आहे, असं मुळी सांगतात.
दरम्यान, तिन्ही मतदारसंघांमध्ये एकूण विषय सद्यस्थिती पाहता जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जनतेला कौल कुणाच्या पारड्यात पडतो हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.



