मावळ तालुक्यात प्रस्तावित उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रयत प्रहार संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रकल्पासाठी जमिनींचा वापर करताना शेतकऱ्यांशी कोणतीही सविस्तर चर्चा करण्यात आलेली नाही. तसेच नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने हा प्रकल्प तात्काळ स्थगित करून शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.











